Monday, 31 May 2021

लढवय्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर

लढवय्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर 

प्रा. अलोक पवार 

मल्हारराव होळकर पुण्याला निघाले होते. बाजीराव पेशव्याच्या सैन्यातील एक महत्वाचे सरदार म्हणजे मल्हारराव होळकर. माळवा प्रातांचे वतन त्यांच्याकडे होते. पुण्याला जात असताना अहमदनगरला जामखेड तालुक्यातील चौंडी गावास ते थांबले. एका महादेवाच्या मंदिरात ते दर्शनास गेले असता तिथे त्यांची नजर एका बालिकेवर पडली. आठ वर्षाची होती ती बालिका. नाव विचारल्यावर अगदी नजर उंचावून 'आहिल्या' असे उत्तर तिने दिले. आपल्या समोर निर्भीडपणे एक फक्त ८ वर्षाची बालिका अशी खंबीर पणे देवाची पूजा करते आपल्या प्रश्नांची उत्तरे देते आहे हे मल्हारराव यांना अतिशय मनाला भावले. त्यांनी त्वरित तिच्या आई वडिलांना भेटून आपला मुलगा खंडेराव याच्या लग्नासाठी बोलणी केली. आणि माळव्याच्या सरदाराची त्यांच्या मुलासाठी मागणी आल्याने आहील्याचे आई वडील नाही म्हणू शकले नाहीत आणि त्या दोघांचे लग्न झाले. 

आहिल्याबाई यांचा जन्म मुळचा अहमदनगरच्या जामखेड मधील चौंडी मधील. ३१ मे १७२५ मध्ये त्यांचा जन्म झाला. माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्या काळी स्त्रियांना शिकविण्याची प्रथा नव्हती मात्र माणकोजी शिंदे यांना जेवढे जमेल तेवढे त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. स्त्रीशिक्षणाला विरोध असतानाही माणकोजी शिंदे यांनी या गोष्टीच्या विरोधात जाऊन शिंदे यांनी मुलीला लिहायला आणि वाचायला शिकवले. 



आहिल्याबाई वयाच्या फक्त २९ व्या वर्षी विधवा झाल्या. त्यांचे पती खंडेराव १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत मृत्युमुखी पडले. त्या काळी नवरा गेला की सती जाण्याची प्रथा होती. मात्र सासरे मल्हारराव होळकर यांनी ही प्रथा न जुमानता आहिल्याबाई यांना सती जाण्यापासून थांबवले. मल्हारराव हे या सर्व गोष्टींमध्ये स्वतःला दोषी मानले मल्हारराव आणि त्यांची पत्नी गौतमीबाई यांचा खंडेराव हा एकमेव आणि प्रथम पुत्र. पुत्र झाल्याने अति लाडाने किंवा संगतीने खंडेराव थोडे बिघडत चालले होते, त्यांना अगदी दारूचे आणि अफूचे व्यसन लागले. त्या व्यसनाने खंडेरावाचा घात केला. अचानक कुम्हेरच्या लढाईत शत्रूची गोळी आली आणि खंडेरावाच्या शरीरात घुसून खंडेराव धारातीर्थी पडले. अहिल्याबाई पतीच्या शोकाने सती जायला निघाल्या खऱ्या मात्र सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितले, आधीच मुलगा गेला म्हणून आमच्यावर आभाळ कोसळले आम्हाला कोण सांभाळणार, तुझा लेक मालेराव देखील लहान आहे त्याला कोण मोठा करणार त्याला अनाथ करणार का? या सासऱ्यांच्या शब्दाला जुमानून आहिल्याबाई सती जायच्या थांबल्या.       

मल्हाररावांनी सर्व जबाबदारी आहिल्याबाईंच्या खाद्यांवर टाकली होती. आहिल्यादेवी दोन्ही म्हणजे घरचा आणि राज्याच्या कारभार अगदी व्यवस्थितपणे सांभाळत होत्या. मल्हारराव यांच्यासोबत युद्धातदेखील त्या सहभागी व्हायच्या. त्यामुळे त्यांना युद्धाचे, रयतेचे ज्ञान अधिकच यायचे. माणसांची पारख कशी करायची कोण कसे आहे, हे आहिल्याबाई अगदी व्यवस्थित शिकल्या. आहिल्याबाई यांना दोन मुले, एक मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. मल्हारराव १७६५ साली आजारी पडून ग्वालेरजवळच्या अमलपूर गावी मृत्युमुखी पडले. नवरा गेला त्यांनतर मोठा आधार असलेला सासरा देखील गेला ही आहिल्याबाईंच्यावर मोठी संकटांची रांग असल्यासारखे होते. मात्र सासऱ्यांनी कोणत्याही संकटाला घाबरून राहायचे नाही अशी शिकवण आहिल्याबाई यांना दिली होती. मल्हाररावांच्या मृत्युनंतर आहिल्याबाई यांच्या मुलाला सुभेदारी द्यायचे ठरले. जून १७६६ मध्ये तसे पेशव्यांकडून तसे पत्र देखील आले. मालेराव २१ वर्षांचा होता. मात्र जहागिरी कशी सांभाळायची हे त्याला अजिबात माहिती नव्हते. त्याला प्राण्याशी खेळायला आवडायचे. वडील खंडेराव यांच्यासारखाच तोही लहरी आणि व्यसनी बनला होता. मालेराव सुभेदार होता तरीही सर्व कारभार आहिल्याबाई स्वतः सांभाळत होत्या. पेशव्यांना देखील या परिस्थितीची जाणीव झाली त्यांनी आहिल्याबाई यांना पत्र लिहून कळविले, हिंदुस्थानच्या कामकाजासाठी आम्ही मालेराव यांच्याकडून काम करून घेऊ मात्र तुम्ही पूर्वीप्रमाणेच आपल्या मुलुखाची जवाबदारी पाहून घ्या. या वरून पेशव्यांच्या डोळ्यात अहिल्याबाई यांचे कर्तुत्व कसे होते हे स्पष्ट होते. मालेराव थोडा वेडसर देखील होता. त्यातच १७ मार्च १९६७ मध्ये तोही मरण पावला. आहिल्याबाई यांच्यासमोर एक एक करून दुखाचा डोंगर उभा राहत होता. 

पुढे आहिल्याबाई यांची मुलगी सती गेली. मात्र तरीही आहिल्याबाई यांनी आपले नेतृत्व सोडले नाही.त्यांनी त्यांच्या अगदी स्त्रीधानातील पैशातून देवळे बांधणे, दानधर्म करणे, धर्मशाळा किंवा नद्यांना घाट बांधणे, अन्नछत्र चालवणे, विहिरी, तलाव बांधणे, रस्त्याच्या दुतर्फा झादे लावणे अशी बरीच कामे पार पाडली. 

आहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण चरित्र पाहिल्यास आणि त्या काळाच्या स्त्रियांची व्यथा बघितल्यास त्या कधीच डगमगल्या नाहीत. त्या अगदी पुढारलेल्या होत्या. त्यांनी परिस्थितीप्रमाणे सर्व अगदी खंबीरपणे सांभाळले होते. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांना त्यांच्यावर त्यांच्या कर्तुत्वावर अगदी प्रामाणिक विश्वास होता. त्यामुळेच कदाचित त्या घडल्या. सासरे आणि सून यांनी केलेल्या आणि जिंकलेल्या लढाईचे कदाचित हेच उदाहरण असू शकते. खुद्द पेशव्यांनी सुद्धा या घटनेला दाद दिली. होती. 

आज आहिल्याबाई होळकर यांची जयंती. त्यांना माझा मानाचा मुजरा. 


4 comments:

  1. अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली. खूपच माहितीपूर्ण.

    ReplyDelete

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...