Saturday, 16 January 2021

माझे मत.... मंदिर प्रवेश आणि मी आणि 'त्या' ही

 माझे मत.... मंदिर प्रवेश आणि मी आणि 'त्या' ही.

प्रा. अलोक पवार

नुकत्याच बीड मधील एका गावामध्ये मस्त दहा दिवस राहायला गेलो. तिथल्या एका देवस्थानामध्ये म्हणजे शंकराच्या अवताराच्या मंदिरात जाण्याचा योग आला. शंकर अवतार आदिनाथाचे ते मंदिर. त्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड दुष्काळ बीड मध्ये असला. बीड मध्ये भरपूर लाईट जाण्याची शंका असली तरी या मंदिरात अहोरात्र भल्या दुपारी सुद्धा थंडगार हवा सुटलेली असते. अगदी दुपार कुठे घालवायची तर त्या मंदिरात असा मस्त प्लॅन होता माझा दहा दिवस. पहिला दिवस तर अगदी त्याच मंदिराच्या थंडगार हवेत गेला. त्याच दिवशी गावात माझ्या भावाचा सत्कार केला गावकऱ्यांनी. मग मी अशीच शंका उपस्थित केली की चला जेवणामध्ये, 'कुछ मिठा हो जाये'. पण परत दुष्काळी गाव तिथे काय भेटणार अगदी ताज्या भाज्या पण मंगळवारच्या बाजारात. मग मी म्हणालो चला नारळ आहे घरात ज्याने सत्कार झाला त्याची वडी करता येईल. भावाला म्हणालो नारळ फोडून दे मी नारळाच्या वड्या करतो जेवायला. हे आज्जीने ऐकून तो नारळ तिकडे आदिनाथाच्या मंदिरात जाऊन फोडून या म्हणाल्या. मग मी म्हणालो चला आपण सगळेच मंदिरात एकत्रित दर्शन घेऊयात. ( माझा उद्देश असाच होता सर्वांनी मस्त गार हवा खाऊन येऊयात) आणि बघता बघता आज्जी आजोबा दोन्ही भावंड, आई, वडील सगळे आम्ही मंदिरात. लहान भावाने मंदिरातील एक लिहिलेलं वाक्य दर्शनास आणून दिले जे मी आधल्या दिवशी अजिबात बघितले नव्हते. "या मंदिरात महिलांनी प्रवेश करू नये". बरं हे मंदिर फार पुरातन काळातील अजिबातच नव्हते म्हणजे येथील लोकांनी वर्गणी करून बांधलेले होते. बरं सगळे वर्गणीदार गावातली सध्याची तरुण पिढी. मग हा स्त्रियांना आतमध्ये न घेण्याचा निर्णय याच पिढीकडून स्वागतार्ह असावा असे जाणवले. अतिशय भयानक निर्णय वाटला. आज्जी बाहेरून म्हणाल्या जा तुम्ही आतमध्ये नारळ फोडायला आम्ही म्हणजे आई आणि त्या बाहेरूनच थांबू असे म्हणाल्या. मी म्हणालो मी नाही जाणार. त्याच्यापुढे त्या म्हणाल्या तुम्हाला चालेल आम्हा बाया माणसांना आतमध्ये नाही जायचे. मी म्हणालो जिथे स्त्रियांना आतमध्ये स्थान नाही तिथे त्याच स्त्रियांनी जन्माला घातलेल्या पुरुषांनी का जावे. इथे फक्त अशा पुरुषांनी जायला पाहिजे ज्यांना फक्त आणि फक्त पुरुषांनी जन्म दिलाय. मी नाहीच गेलो. माझ्या मनातील चलबिचल सुरूच होती त्या हवेशीर मंदिराबाबत. अवघड होते सगळे. ज्या गावात स्त्रियांना त्यांची लाज झाकायला साधी संडास ची सोय नव्हती तिथे लोकांनी वर्गणी काढून काढून देवस्थाने बांधली आणि त्यामध्ये फक्त वर्गणीदार पुरुष प्रवेश करणार. दुसरी गोष्ट मला आणखीन खटकली ती म्हणजे मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर टीप टीप पाण्याच्या अभिषेक होत होता. पुराण वैगरे काही बघितले तर आपण त्याला पाणी म्हणण्यापेक्षा "गंगा" असे म्हणतो. बरं ही गंगा स्त्री असून आतमध्ये कशी हे कळले नाही. याच पिंडीवर कधी कधी दुधाने अभिषेक होतो ते गाईचेच बरे त्या गाईच्या दुधाला पण आतमध्ये प्रवेश. आणि महत्वाचे म्हणजे शंकर हा महादेव नेहमी पार्वतीच्या अर्धरूपाने ओळखला जात असेल तर तिथे पार्वती असेलच मग या स्त्रियांना का आतमध्ये प्रवेश नाही. पाळीच्या दिवसात स्त्रिया या अपवित्र असतात वैगरे वैगरे, असतील तर इतर दिवसात काय अडचणी आहेत आणि मग म्हाताऱ्या बायका आणि लहान मुलींना काय प्रवेशास अडचण. मध्ये पुण्यातील एका रणरागिणी तृप्ती देसाई यांनी बऱ्याच मंदिरांची दारे महिलांसाठी खुली केली. शबरीमाला च्या म्हणजे केरळच्या मंदिराचे मोठे प्रकरण याच विषयांनी गाजले. दुपारी याच डोके जड करणाऱ्या विषय घेऊन घरी आलो. घरी मला आणि भावाला भेटायला गावातील जिल्हा परिषद च्या शाळेतील सर त्यांच्या मुलाला घेऊन आलेले. आपल्या शिक्षकी पेशातील एखादा माणूस भेटला तर मन प्रसन्न होत तस झालं अगदी माझं. त्यांचा मुलगा यूपीएससी परीक्षा नुकताच पास झाला होता. म्हणजे दिल्ली मधील फक्त मुलाखत बाकी होती. इतक्या अभ्यासू मुलाची भेट बीड सारख्या गावात होती ही त्या गावाला लागलेली सुखद पर्वणीच होती. मी त्याचे अभिनंदन केले. सरांनी त्यांची मुलगी एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्गात आहे सांगितले. मग मला अगदीच राहवेना म्हणून मी तो मंदिरातील स्त्री प्रवेशाचा विषय काढला. सर तुम्ही मनात आणले तर ही परिस्थिती बदलू शकते. सर म्हणाले की आमच्या स्त्रियांनाच या गोष्टीत उत्सुकता नसते आणि आपण कशाला धार्मिक बाबतीत मध्ये पडायचे. सर्व संभाषणात त्यांच्या मुलानेही प्रवेश घेतला. तो म्हणाला शबरी माला प्रवेशात इतका खर्च झाला की ज्यामध्ये ६ महिने शिक्षण खर्च राज्याचा निघाला असता. माझा सुरही काही थांबत नव्हता मी म्हणालो अरे ६ काय एक दोन वर्षांचा अजून जाऊ दे पण पुढे समानता तर येईल. तोही म्हणत होता आपले अडते कुठे पण या मंदिरात प्रवेश महिलांनी नाही केला तर म्हणजे मला काय त्रास होतो. मी अगदीच साफ पणे उत्तर दिले. त्रास मला भरपूर झाला जेंव्हा मी आतमध्ये प्रवेश केला आणि माझ्यामागे आमची म्हातारी आज्जी चपला काढून रखरखत्या उन्हात उभ्या होत्या. मला त्रास झाला जेंव्हा मी पुढे गेल्यावर बघितले ज्या आईने आरतीचे ताट केले ती चपला काढून बाहेर उन्हाच्या झळा खात होती. लहान बहिणी नशीब नव्हत्या नाहीतर त्यांचे पाय पोळले असते ही शंका बाहेर काढली. हे संभाषण वाढत होते त्यावर त्या मंदिरामध्ये जाण्यापेक्षा जर मुलींच्या शिक्षणावर भर दिला तर ते उत्तम होईल असे काहीसे पलीकडून म्हणणे आले. पण शिक्षण घेऊनही पुढे जर बदल स्वीकार होणार नसेल तर काय फायदा या पुरुषसत्ताक मानसिकतेचा, हा प्रश्न खूप समोर होता. मी शेवटचं एक वाक्य बोलून थांबलो शेवटी, ज्या मंदिरात माझ्या जन्मदात्या आईसारख्या स्त्रियांना प्रवेश नाही अशा मंदिरात मी जाणार नाही. मी अशा मंदिरांवर निषेध व्यक्त करतो. आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. हा त्या देवाला मला भेटायची इच्छा झाली तर मी नक्की भेट देईल आणि हो देव सहपत्नी येऊ शकतात हा.
बरं पुढचे माझे तिथले मनाला न पटणारे शोधही थांबे ना. गावाच्या सरपंच महिला, गावाची उपसरपंच महिला, गावाची नायब तहसीलदार जी माझी विद्यार्थिनी आहे तीही महिला, जिल्ह्याची मागील पाच वर्षांची आणि पुढिलही पाच वर्षे होऊ घातलेली खासदार प्रीतम मुंढे त्याही महिलाच, आणि याच जिल्ह्याच्याच पंकजाताई मुंढे यादेखील मंत्री मंडळात बसतात. मग जर बीड च्या महिला अशा भरारी घेऊ शकतात तर त्यांना का प्रवेश नाही मंदिरात.... बर मी काही प्रयत्न करावेत तर मी गावातील नाही आज असेल उद्या नाही. माझा असा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो. चला म्हणालो लिहिण्यातून व्यक्त व्हा.

(हा लेख मी ८ जून २०१९ ला फेसबुक वर सर्वप्रथम लिहिला होता.)

Saturday, 2 January 2021

सावित्रीबाई फुले : नव्या शिक्षणयुगाची सुरवात

 सावित्रीबाई फुले : नव्या शिक्षणयुगाची सुरवात

प्रा. अलोक पवार

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता बऱ्याच स्त्रियांची नावे घेता येतील ज्यातून स्त्री कुठे कमजोर किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये मागे पडते आहे असे दिसत नाही. मग त्यामध्ये अगदी स्त्री देवतांचा पण समावेश दिसून येतो. पण या देवतांचा आशावाद कुठे या कलयुगात कुठेतरी मावळला गेला हे कळत नाही. या काळामध्ये जी जातीय रचना केली गेली आहे त्यामध्ये आधीच कनिष्ठ जातीच्या लोकांना हिणवले गेले. हे शोषण सामान्य नव्हते तर या लोकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व गोष्टींवर घाव घालणारे असे होते. कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्यावर या लोकांना बंदी होती. जशी जातीय रचनेमध्ये या लोकांची घुसमट दिसून येत होती तशीच आणखीन एक शोकांतिका पुढे येत होती जी लिंगभवावर आधारलेली होती. स्त्रियांना कोणत्याच प्रकारे विचार करण्याचा अधिकार, मुभा त्या काळी नव्हता. 

त्याकाळी नवीन मूल दवाखाना किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रगत डॉक्टरांच्या नजरेत न जन्म घेता घरीच जन्म घेत होत. मग ते मूल त्याकाळी आखल्या गेलेल्या कोणत्याही जाती धर्मातील असो किंवा जन्म घेतल्यावर कोणत्याही लिंगाचे असो. बाळ जेंव्हा जन्माला यायचे तेंव्हा तो कोणत्या घरात जन्माला आहे यावरून त्याचे भाग्य लिहिले जायचे, म्हणजे जर उच्चभ्रू घरात जन्मलेला पुरुष बालक हा त्याकाळी अफाट भाग्य त्याकाळी जन्म घेतल्यावर सोबत घेऊन आला आहे. त्याने त्याकाळी ज्या कुळात जन्म घेतला आहे त्याचे अहोभाग्य रेखांकन केले आहे आणि हेच उलट झाले म्हणजे मुलगी जन्मली तर तिला स्वयंपाक घर, आपल्या घराण्याचे रीतिरिवाज या गोष्टी घरातल्या जेष्ठ स्त्रिया शिकवत. कनिष्ठ जातीतील सर्वच लोकांचे प्रश्न अधिकाधिक गंभीर होते. वरिष्ठ जातीतील पुरुष यांनाच फक्त समाजात मानाच स्थान होत. समाजामध्ये जो आदर मानसन्मान होता त्यावर फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. आणि स्त्रियांच्या जीवनात फक्त आणि फक्त अंधकार होता. त्यांचे आयुष्य फक्त चुलीजवळ, आपल्या मुलांना मोठे करा, घरच्यांची सेवा करा, त्यांना हवे ते द्या, आपल्या पूर्वजांनी जे संस्कार आपल्याला दिले ज्यामध्ये फक्त पुरुषी सेवा लिहिली आहे त्याचा पाठ मुलांना द्या. हाच काय त्या काळच्या स्त्रियांचा जीवनाचा प्रवास. 



या सर्व गोष्टींमध्ये बदल होणे अत्यावश्यक होते. बऱ्याच समाजसुधारकांनी यामध्ये आपल्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न केला. स्त्रिया यांनी बऱ्याच गोष्टींवर पिछाडीवर टाकले होते. अगदीच कमी वयात त्यांचे लग्न केले जायचे, वर जो साथी त्यांच्या नशिबात लाभे तोही वयाने जास्ती. कधीतरी बहुपत्नी असलेला, तर कधी मुलाची आसक्ती असलेला. बरं असा नवरा वयाने जास्ती असलेला कधी जर काळाने नेला तर या स्त्रीचे जगणे हे नरकयातने पेक्षा अजिबात कमी नसायचे. सुरवातीला लगेचच तिचे केशवपन कोणत्याही सौन्दर्याची ती हक्कदार नव्हती तिचे लगेचच केशवपन केले जायचे. तिने आयुष्यभर विधवा म्हणून जगणे, आणि त्या पलीकडे तिच्याकडे काही कुदृष्टी पडल्यास तिच्याकडे, तिची बाजू घेण्यासाठी कोणीच नाही, एकंदरीतच सर्वत्र अंधकार. बऱ्याच समाजसुधारकांनी केशवपन, विधवा पुनर्विवाह अशा जटिल गोष्टी समाजापुढे मांडल्या. त्याची पुष्टी करून त्या प्रस्थापित कशा होतील याकडे लक्ष दिले.

या सर्व सुधारणेच्या गोष्टींमध्ये तिला शिक्षण देणे अतिशय महत्वाचे होते. आणि ही त्याकाळची गरज ओळखून ज्योतिबा फुले त्याकाळी पुढे सरसावले. त्यांनी आपल्या घरातूनच सुरवात केली. माझ्या या स्त्री शिक्षणाच्या कार्यात मोठा हातभार लावण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. आजच्या वयाच्या आणि लिंगभवाच्या संरचनेनुसार बघितले तर या फुले दाम्पत्याचा बालविवाहच झाला होता. सावित्रीबाई नऊ वर्ष तर ज्योतिबा हे अवघा तेरा वर्षाचे होते. पण शिक्षण घेणे आणि देणे याबाबत दोघांचेही विचार एका आद्यक्रांतिकारकाप्रमाणे पुढे सरसावत होते. 

रस्तावर चालणाऱ्या व्यक्तीला जर पुढे जाताना मार्गात अडथळे आले तर तो व्यक्ती सुकर मार्ग कसा मिळेल याकडे लक्ष देऊन आपला मार्ग बदलणे पसंत करतो. मात्र फुले दाम्पत्याच्या या मार्गात अनेक अडचणी येऊन सुद्धा दोघेही आपला मार्ग जो स्त्रियांसाठी दिशादर्शक असेल तो जरासुद्धा बदलण्याचा विचार त्यांनी केला नाही. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये जी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यामध्ये स्त्री शिक्षिकेचे काम सुरू केले. हे काम त्या काळच्या समाजाला अजिबातच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार हे नरकाचे दरवाजे उघडण्याचे, अभद्र असे काम फुले दाम्पत्य करते आहे असे त्यांचे मत होते. त्यावेळी असलेल्या ब्राह्मणांनी, कर्मठ सनातनी लोकांनी बोलून काहीच फुले दाम्पत्यावर परिमाण होत नाही हे पाहून काही आक्रमक पावल उचलली. सावित्रीबाई त्यांच्या घरून निघाल्या की त्यांना वाटेतच गाठून चिखल, शेण टाकून त्यांचा मार्ग अडवता कसा येईल हे त्यांनी लक्ष ठेवले. पण जर असल्या धमक्यांना भीक घातली तर आपले लक्ष कसे पूर्ण होईल याची मनसा सावित्रीबाई फुले यांनी डोक्यात घेतली. त्यांची एक साडी चिखलाने, शेणाने माखली तर त्यांनी दुसऱ्या साडीची सोय केली, खराब झालेली साडी बदलून खराब साडी धुवून वाळवून दुसऱ्या दिवशीची सोय त्यांनी केली होती. त्यामुळे आपण अहिंसा किंवा शांततामयी क्रांती बद्दल जर कोणी सुरवात केली असेल तर ती सावित्रीबाई यांनी म्हणावयास हरकत नाही. ब्रिटिश भारतात आले त्यांनी अत्याचार केले त्याला विरोध करणे हे एक बाजूला होतेच मात्र आपल्याच भारतीय संस्कृती ला विरोध दर्शविणारे कार्य फुले दाम्पत्य करीत होते. बाहेरील लोकांना विरोध करताना इकडचे सर्व लोक एकत्र येऊन क्रांतिकारी पावले उचलत होते मात्र इथे परिस्थिती अशी होती की स्त्री शिक्षणाचा हा लढा सावित्रीबाई यांना बाहेरच्या नाही तर भारतातल्याच कनिष्ठ वर्गातील लोकांच्या विरोधात उभा केला होता. सावित्रीबाई फुले यांनी कोणतीही तमा न बाळगता आपले शिक्षण दानाचे कार्य सुरू ठेवले. पुढे सावित्रीबाई याच शाळेच्या मुख्याध्यापिका बनल्या. पुण्यामध्ये आणखीन स्त्री शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झाल्या. यामध्ये आणखीन मदतीचे हात पाहिजे होते. समाजविरोध असूनही स्त्री शिक्षण काम सुरू ठेवले आहे म्हणून घराबाहेरच्यांनीच नव्हे तर घरातील लोकांनी म्हणजेच ज्योतिबाच्या वडिलांनी गोविंदराव यांनी देखील कडाडून विरोध दर्शविला आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर काढले. त्यावेळी आपल्या समाजातून कोणाकडून निवाऱ्यासाठी मदत मिळणे ही अपेक्षाच चुकीची होती. अशावेळी फातिमा शेख या मुस्लिम स्त्रीने आपल्या स्वतः च्या घरात या दाम्पत्याची राहायची सोय केली. 

आज जिथे हिंदू मुस्लिम दंगली होतात, एक मोठा लढा हे दोन समाज करतात तिथे त्या काळी या मुस्लिम कुटुंबाने आपल्या घरात फुले दाम्पत्याची राहायची सोय केली हे आज आपण युवकांनी लक्षात घेतल पाहिजे. पुढे या शिक्षण कार्यात या फातिमा शेख यांनी पण उडी मारली. सावित्रीबाई फुले यांनी फातिमा यांना देखील आपल्या कार्यात ओढले. फातिमा शेख या देखील पुढे पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका झाल्या.

सावित्रीबाई फुले यांनी भारताच्या इतिहासात स्त्री शिक्षणाची मुळे भक्कम रोवली. आजही जिथे स्त्रियांचे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले आहे की नाही यावर शंका आहे तिथे शंभर वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणप्रसारचे काम केले संपन्न केले होते. आज बऱ्याच हिंदी मराठी मालिकांची नावे क्योकी सास भी कभी बहु थी, माझ्या नवऱ्याची बायको अशा स्त्रियांचा लढा दाखवणाऱ्या मालिका दाखवल्या जातात आजचीच परिस्थिती दाखवली जाते. आजही माहेरची साडी हा चित्रपट लोकप्रिय होतो, याच धर्तीवर सावित्रीबाई फुले यांचे त्या काळाचे कार्य किती प्रभावशाली जाणवते. स्त्रियांनी हातात त्या काळी तलवार घेतली होती. पण तलवार किंवा युद्धशिक्षण घेणाऱ्या या स्त्रिया या राजघराण्यातील होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे तळागाळातील स्तरावरच्या स्त्रिया देखील शिक्षण घेण्यास समर्थ झाल्या. आज स्त्रिया डॉक्टर, वकील, शिक्षिका, व्यावसायिका, उद्योजिका, संशोधक, झाल्या त्यातील प्राथमिक आणि आधुनिक शिक्षणाची सुरवात सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी केली नसती तर आजची स्त्रिया या अंधारात आयुष्य जगत असत्या. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी युगप्रवर्तक म्हणून कार्य केलेले विसरता कामा नये. सावित्रीबाईंनी एका शिक्षण युगाला सुरवात केली असे देखील म्हणायला हरकत नाही. हे फक्त स्त्रीने च नव्हे तर पुरुषांनी पण लक्षात घेतले पाहिजे. माझी आई शिकली म्हणून मी शिकलो. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली होती तिला आजही आपण अखंडपणे तेल वाहायला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक स्त्री म्हणजेच आपली आई- बहीण-बायको- मुलगी- मैत्रीण शिकते आहे ना. तिच्या शिक्षणात कोणत्याही प्रकाराचे आधुनिक शेण गोळे पडता कामा नये यावर आपण लक्षात घेतले पाहिजे. मग या शेणगोळ्याचे स्वरूप, हे बालविवाह, लवकर आलेली संसाराची जवाबदारी, चूल आणि मूल ही नैतिक जवाबदारी, लहान भावंडांचे संगोपन, या प्रकारचे असू शकते. चला सर्वांनी सज्ज व्हा. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला त्यांचे कार्य अमर करूयात. निदान एक मुलगी शिकवू तिच्या मार्गतले अडथळे दूर करू याचा संकल्प करू. सावित्री अमर करू...


जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...