Saturday, 19 December 2020

कविता चौहान : शिक्षण माऊली

कविता चौहान : शिक्षण माऊली
प्रा. अलोक पवार
मराठी पाऊले चालती पुढे, हे वाक्य महाराष्ट्रातल्या मातीतल्या सर्वानाच माहिती. मात्र मराठीतल्या मातीमध्ये चालण्यासाठी त्याच मातीशी नाळ बांधून देणाऱ्यांंपैकी एक म्हणजे आमच्या कविता चौहान मॅडम. 


महाविद्यालयात शिकवताना विद्यार्थी आधीच पक्का नसेल तर आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांना फार डोकेफोड करावी लागते. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात जर पाया भक्कम नसेल तर पुढे कुठेतरी खडतर आयुष्य जगावे लागते. बऱ्याच लहान मुलांच्या आयुष्यात हे शिक्षणाचे बीज रुजले जातच नाही. म्हणजे परिस्थितीमुळे, खायची मारामार असेल ना तर पाहिले प्राधान्य शिक्षणापेक्षा जगण्याच्या धडपडीकडे दिले जाते. 


पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात उस्मानाबादमधील आदिवासी भागातून बरेच लोक रस्त्यावर हार करण्यासाठी पथारी मांडून राहतात. हे सर्व लोक आपल्या पोट पूजेसाठी हार बनवून जरी रस्त्यावर विकत असतील तरी त्यातून भागत नाही म्हणून यांची मुले रस्त्यावर भीक मागण्याचे काम करतात. या मुलांना शालेय शिक्षणाची गोडी आणि माध्यन्य भोजनाची सोय लागावी म्हणून मी २०१९ मध्ये सर्वेक्षण केले होते. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचे आडनाव पवारच होते. त्यामध्ये मला एक मुलगा भेटला जो आधीच शाळेत जात होता. त्याने मला तिथे रस्त्यावरच त्याचे शाळेचे प्रगती पुस्तक काढून दाखवले तर त्याच्या वर्गशिक्षक मॅडमचे नाव होते सौ. कविता चौहान. तो शाळेचे आणि खास करून त्याच्या बाईंचे इतके कौतुक करीत होता की त्याला कविता मॅडम म्हणजे त्याच्या अंधारमयी जीवनात एक प्रकाशाचा किरण भेटला. आपल्याला अभ्यास करायचा असतो, इतकेच माहिती असते पण त्या अभ्यासाने आपण आपली दिशा कशी बदलू शकते हे त्या मुलांच्या बालमनाला सुंदर पटले होते. त्याला हे कविता मॅडमच्या सततच्या मार्गदर्शनानेच साध्य झाले असावे. मॅडम देखील या मुलांविषयी बोलताना आत्मीयतेने बोलत असतात. कोरोना काळामध्ये ही मुले रस्त्यावरून गायब झाल्यावर ती नक्की कुठे आहेत त्यांचा शोध लागतो का हे बघण्यासाठी कासावीस झालेल्या मॅडम आम्ही बघितल्या आहेत. त्यांचे हे समाजकार्य अथांग आहे.
कविता चौहान यांनी डीएड पूर्ण झाल्यावर इतिहासात बीए आणि बीएड देखील पूर्ण केले. पोलीस खात्यात उच्च पदस्थ नोकरी करणारा नवरा असूनही एक स्त्री म्हणून आपली वेगळी ओळख असावी म्हणून सौ. चौहान यांनी शाळेतल्या मुलांना शिकवायला सुरवात केली. बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी खडकवासला, शिवणे अशा लांबच्या शाळांमध्ये नोकरी करूनही मॅडमच्या चेहऱ्यावर थकवा नसून आपण लहान मुलांवर कष्ट घेतोय या गोष्टीची लकाकी दिसून यायची. जिल्हापरिषद शाळा, भिमाले हायस्कुल, संदेश नगर अशा शाळांमध्ये नोकरी करून सध्या कविता मॅडम संत ज्ञानदेव हायस्कुल, मुकुंद नगर येथे कार्यरत आहेत. शाळेसाठी शाळाबाह्य मुले शोधायची, त्यांना शिकवणे हे महत्वाचे असतेच पण कविता मॅडम थोडा वेगळा प्रयत्न करताना दिसतात. या मुलांना त्या शिक्षण प्रवाहात टिकायचे कसे याबद्दल ज्ञान देताना दिसतात. ३६ वर्षाच्या या ज्ञानदानाच्या प्रवासात त्यांनी बरीच मुले घडवली. त्यांच्या याच कार्यासाठी पुणे महानगरपालिकेने त्यांना 'आदर्श शिक्षका' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 
श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी, धनकवडी, पुणे म्हणजेच माझ्या स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयाच्या संस्थेच्या सौ. कविता चौहान या माननीय सदस्या आहेत. आमच्या कामातील होणाऱ्या चुका कविता मॅडम आम्हाला अगदी एक चोखंदळ मार्गदर्शकाप्रमाणे समजावून सांगत असतात. 
कविता मॅडम यांचे सुपुत्र अभिजित हे आमच्याशी बोलताना मॅडमविषयी माहिती विचारल्या वर पहिले आम्हाला सांगतात की, "माझी आई ना सुंदर आहे, आणि त्यामुळेच मी असा स्मार्ट आहे". खरंच प्रतिभासंपन्न अशा कविता चौहान मॅडम या फक्त दिसण्यातच नव्हे तर त्यांच्या कार्यातही सुंदर दिसून येतात.
आज २० डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावरील थोडेसे टिपण...…

Thursday, 10 December 2020

जाणती राणी : प्रतिभा मधुकर पवार

जाणती राणी : प्रतिभा मधुकर पवार  

प्रा. पवार अलोक अर्जुन अलका 

१ जानेवारी १९८१ साली साली रामचंद्र सुतार राहणार महुडे, ता. भोर, जिल्हा पुणे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या या प्रतिभाशाली कन्येचे नाव त्यांनी प्रतिभा हे ठेवले. प्रतिभा यांचे शिक्षण दहावी इतकेच झाले. घरच्या परिस्थितीमुळे प्रतिभा यांना खूप जास्त काही शिकता आले नाही. १६ जून १९९७ या त्यांचे लग्न आळंदेवाडी, ता. भोर, जि. पुणे  च्या मधुकर भगवान पवार यांच्यासोबत झाले. मधुकर पवार यांची परिस्थिती देखील बेताचीच होती. मात्र म्हणतात ना घरातल्या स्त्रीने जर ठरविले तर झोपडीला पण महाल बनायला वेळ लागत नाही. पण प्रतिभाजींचा हा संघर्ष देखील पाहावा तितका सोप्पा नव्हता. मधुकर हे सुतार काम करीत. या कामामुळे पाहिजे तितके उत्पन्न हातात प्राप्त होत नव्हते. त्यामुळे प्रतिभा यांनी स्वत: घराबाहेर पडून काम करण्याचा निश्चय केला. कारण घरी आपली वृद्ध सासू, आपली दोन लेकरे चेतन आणि अजित ही देखील आपली नैतिक जवाबदारी आहे असे प्रतिभाताई आणि मधुकर पवार हे दाम्पत्य व्यवस्थित पणे जाणून होते. त्यामुळे प्रतिभा या स्वत: टी. ई. कनेक्टीव्हिटी नावाच्या शिरवळच्या कंपनीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीमधील वायरिंग चे काम प्रतिभाताई शिकल्या आणि दरमहा जो पगार मिळतो त्यावर हे कुटुंब हळूहळू आपला संसार चालवू लागले.    

पुढे मधुकर पवार यांना गावातले ग्रामपंचायत सदस्यत्व मिळाले. आपले गाव हळूहळू सुधारावयाचे आहे यासाठी मधुकर पवार यांनी बरेच प्रयत्न या ग्रामपंचायत सदस्य मिळाल्याच्या कारकिर्दीत केले. दहा वर्षाच्या या कालखंडात गाव 'हागणदारीमुक्त' झाले. आळंदेवाडी या गावासाठी हा मोठा नावलौकिक होता. हे गाव व्यवस्थित व्हावे हे प्रत्येक गावकऱ्यांचे स्वप्न म्हणावयास हरकत नाही. त्यासाठी गावातच एक छोटी प्राथमिक शाळा सुरु झाली. या शाळेला अगदीच छोटेसे स्वरूप होते. 

२०१५ साली गावातील महिला सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी या पदासाठी आरक्षित झाले. घरची बेताची परिस्थिती असणाऱ्या या प्रतिभाजींना राजकारणातला किंवा समाजकारणातला लवलेशही नव्हता. मात्र बऱ्यापैकी गावाची आशा या सरपंच पदासाठी योग्य उमेदवार या 'प्रतिभा पवार' याच होत्या. कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे नाजूक परिस्थितीमध्ये घर सांभाळले होते तसेच आता गावाला देखील सांभाळायचे होते. गावाला एक नवीन दिशा द्यायची होती. संपूर्ण गावाची जवाबदारी मी सांभाळू शकते का? सरपंच पद मग मला शक्य होईल का? माझ्या कामात काही चूक झाली तर? माझे शिक्षण मला या गावाच्या समस्या समजण्यासाठी कमी पडले तर? या सर्व गोष्टी प्रतिभाजींच्या डोक्यात थैमान घालत होत्या. घरामध्ये अजित - लहान मुलाचे आजारपण देखील प्रतिभा यांना बघायचे होते. मात्र मधुकर पवार यांनी ही सर्व जवाबदारी आपण व्यवस्थित पेलवू शकतो असे खंबीर आश्वासन प्रतिभा पवार यांना दिले. आणि काय ०७ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रतिभाताई आळंदेवाडी गावाच्या दुसऱ्या महिला सरपंच झाल्या. त्यांच्या सरपंच पदाचे कौतुक म्हणजे गावातून लोकांमधून निवडून आलेल्या त्या पहिल्याच महिला सरपंच होत्या. त्यांच्या सरपंच पदाची मिरवणूक गावातल्या लोकांनी खूप मस्त काढली.  


सौ. प्रतिभा मधुकर पवार, सरपंच, आळंदेवाडी, ता. भोर, जि.पुणे    

सरपंच पद भेटल्यावर त्या पदावर किंवा त्या पदाचा गैरवापर करून घरामध्ये किंवा आपल्या नातलगांचा फायदा होईल अशी बाब प्रतिभाजींना कधीच नव्हती. त्यामुळे आपल्या पतीकडून आणि गावामधील ग्रामसेविकेकडून जी योग्य माहिती मिळेल त्या आधारे त्या आधारे प्रतिभाताई आपले काम चोखपणे करीत होत्या. आपल्याला परिस्थितीमुळे शिकता नाही आले तर गावातील लहानग्यांना या गोष्टीचा कुठेही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्याच सरपंच पदाच्या कालावधीमध्ये पहिले धडाडीचे काम झाले ते गावातील आपली साधी शाळेची डागडुजी करण्याचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण झाले. आणि या कामामध्ये सर्व तरतुदी झाल्या पाहिजेत यासाठी खुद्द खासदार मा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या प्रोत्साहानात हे काम झाले. सुळे या कामाच्या पूर्ततेसाठी दोन वेळा गावातही आल्या. प्रतिभा पवार यावरच थांबल्या नाहीत. गावातला कच्चा रस्ता पक्का करणे, सांडपाण्याचा निचरा होण्याची सोय असेल घरोघरी नळ बसविण्याची मोहीम असेल सर्व कामगिरी त्यांच्या कारकीर्दीमध्ये सर होत होती. खंडोबाच्या वाडीमधील अंतर्गत रस्ते असतील किंवा तेथील अंगणवाडीतील फर्निचर दुरुस्ती असेल किंवा तेथील विद्यार्थ्यांच्या शौचालयाची दुरुस्ती असेल या सर्व कामांची दखल प्रतिभा पवार यांनी चोख पणे केली. तसेच आपल्या या पाच वर्षातील सरपंच पदाच्या जे जुने ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याचे देखील नूतनीकरण प्रतिभाजींनी व्यवस्थितरित्या केले. तसेच याच कालावधीमध्ये गावामध्ये स्मशानभूमी बांधकाम आणि संपूर्ण गावाला ज्या विहिरीने पाणीपुरवठा होतो त्या विहिरीवर जाली बसविणे अहि दोन महत्वाच्या कामांसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे काम यांच्याकडून पाठविण्यात आला. ग्रामपंचायतीला एलईडी टीव्ही देण्याचे कामही याच काळात झाले. 

या सर्व ग्रामपंचायतिची कामे करताना कुठेही घरी देखील आभाळ कोसळू नये यासाठी त्यांनी आपली नोकरी देखील सोडली नाही. पाच वर्ष सरपंच असताना देखील त्या त्यांच्या शिरवळच्या कामाला व्यवस्थित पणे जात होत्या. 

प्रतिभा पवार यांनी नुकतेच आपल्या मोठ्या मुलाचे लग्न लावून दिले. कोरोना कालावधीमध्ये अगदी थोडक्या लोकांमध्ये हे लग्न लावले. आपल्या मुलांना थोडे घर पण मोठे झाले पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या पतीच्या मागे लागून जुन्या घराचे बांधकाम सुरु केले.  

२०१८ साली आमचा संपर्क प्रतिभाताई यांच्याशी आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचचे हिवाळी शिबीर नेण्यासाठी झाली. असा कोणत्याही प्रकारचे शिबीर त्या गावामध्ये यापूर्वी आले नव्हता. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरातूनआपल्या गावाला नक्कीच फायदा होईल विकास कामे होतील या हेतूने आमच्याकडून माहिती एकूण प्रतिभा ताई यांनी लगेच होकार कळविला होता. सरपंच असूनही स्वत: आमच्यासाठी बिनादुधाचा चहा प्रतिभाजींनी आमच्यासाठी प्रथम: केला होता. आम्हाला चहाची अत्यंत गरजच होती. त्यावेळी तो चहा अतिशय सुंदर लागला होता. त्यांनी लगेचच इतर सदस्यांना फोन लावून आमच्या शिबिराची मान्यता दिली होती. गावात शिबिराचे उत्घाटन करताना प्रतिभा ताई यांनी आम्ही आवर्जून या असे म्हणालो होतो, मात्र मोठ्यांना आणि प्रामुख्याने गावातील पुरुषांना मन द्या असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तुम्ही सरपंच आहात आणि तुम्हीच मानकरी म्हणून आल्या पाहिजेत अशी आमची अट होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता प्रतिभा ताईंनी आमच्या शिबिराचे उत्घाटन केले. आठ दिवस आमच्या शिबिरात त्या जातीने लक्ष द्यायला यायच्या मुलांना माझ्या घरून पाणी प्यायला द्या त्यासाठी त्यांना बादल्या व कळशीची सोय ताईंनी व्यवस्थित मार्गी लावली होती. त्याच वेळी संकष्टी चतुर्थी आली होती. सर्व पोरांना माझ्याकडे गणपतीच्या आरतीला घेऊन या असे त्यांनी मला आवर्जून सांगितले. प्रत्येक मुलासाठी त्यांनी मोदकाचा प्रसाद करून ठेवला होता. आमच्या मार्गदर्शन कार्यक्रमांना त्या आवर्जून येऊन बसायच्या. 



शिबीर पूर्ण झाले आमचा समारोप झाला. मात्र पुढे जानेवारीमध्ये मी आणि माझा विद्यार्थी आकाश कोल्हे आम्ही पुन्हा तीन दिवस अगदी राहायच्या निमित्ताने पुन्हा गावात गेलो. पुन्हा स्वच्छता शिबीर पार पाडायचे होते. आकाशला बघून त्यांनी हाच ना तुमचा हुशार विद्यार्थी आकाश असे अगदी लगेच ओळखले. आकाशने गावात तीन दिवस स्वच्छतेचे केलेले काम पाहून प्रतिभा पवार यांनी आकाशला लगेच ग्रामपंचायत मध्ये बोलून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. 


मी आणि आकाशने गावातील महिलांना काहीतरी नवीन कौष्यल्य कार्यक्रम करावा असा देखील आमचा हेतू होता. मात्र गावामध्ये ज्या महिला या कार्यक्रमात सहभागी होतील त्या पेरणीच्या वेळात सकाळी अजिबातच उपलब्ध होऊ शकणार नाहीत हे त्यांनी आम्हाला सांगितले. कारण की ही पेरणी आम्ही महिलांनी एक दिवस जरी चुकवली तरी शेताच नुकसान होऊ शकते. त्यामुळे दिवसाच्या वेळी हा कार्यक्रम होऊच शकत नाही. पुढे "मग हा कार्यक्रम रद्द करूयात का?" हा माझा प्रश्न होता. सर संध्याकाळी सर्व महिला स्वयंपाक करून हनुमान मंदिरात जमतील तुम्ही रात्री घेऊ शकता का कार्यक्रम. मी आनंदाने हो म्हणालो ताईंनी बर्यापैकी स्वत: घरोघरी बायकांना निरोप देऊन हा साड्यांपासून पायपुसणे बनविणे आणि मोगऱ्याचे गजरे बनविण्याचा कार्यक्रम देऊन संपन्न केला होता.     

सरपंच असताना कोणत्याही प्रकारे मी सरपंच आहे या गोष्टीची शेखी न मिरवता साधेपणानी प्रतिभा जींनी गावात एक वेगळ्या प्रकारे एक आदर्श सरपंच कशी असावी हे दाखवून दिले. त्यांना सरपंच पदाचा लोभ कधीच नव्हता. दिनांक ५ नोव्हंबर २०२० रोजी प्रतिभा पवार यांचे सरपंच पद संपुष्टात आले. मात्र त्यांनी गावासाठी पुरेपूर कामे केली. गावाचा डोळ्यांनी दिसणारा विकासच हे सर्व बोलून दाखवतो. 

मात्र ५ डिसेंबर २०२० रोजी काळाने प्रतिभा पवार यांच्यावर घाला घातला. एका लग्नाला मुलासोबत टू - व्हीलर वर जात असताना अपघात होऊन प्रतिभा ताई मृत्युमुखी झाल्या. जातानाही त्यांनी गाडी चालविणाऱ्या मुलाला काहीच झाले नाही याची दक्षता त्यांनी घेतली. कदाचित त्यावरचेही संकट प्रतिभा पवार यांनी स्वतवर ओढून घेतले. आपल्या नवीन घरामध्ये सुखी संसाराचे स्वप्न त्यांचे अर्धवट राहिले. मात्र गावामध्ये त्यांनी गावाला दिलेली प्रतिभा ही गावामध्ये कायम राहिली असे म्हणायला काहीच हरकत नाही. या जाणत्या राणीला सर्वांना समजावून घेणाऱ्या प्रतिभाजींना माझा अखेरचा सलाम  ....             

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...