लीला मिटकरी : तू माझी सावित्री मी तुझा यशवंत
पवार अलोक अर्जुन अलका
म्हणतात
ना प्रभू तुझी लीला काहीशी वेगळीच. आणि तुझी लीला अनुभवणारा देखील तुला समजतो. ही
लीला कळते ती म्हणजे साक्षात आईच्या रूपात. आणि मग ती आई नेहमी प्रेम करत असते.
आमच्या कडे पण एक extra आई आहे. घरी नाही
कामाच्या ठिकाणी. आमच्या श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा लीला वसंत
मिटकरी.

लीला
मिटकरी, मूळच्या बीड जिल्ह्यातल्या. आता हे
मूळच्या बीड च्या हे सांगणे अतिशय महत्वाचे कारण मराठवड्यातला बीड जिल्हा हा फक्त
आणि फक्त दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे. पाऊस या भागावर तसा नाराजच. कदाचित या
दुष्काळी भागामुळे आम्ही आमचे अहोभाग्य मानतो की आम्हाला अजून एक आई भेटली.
हिवरशिंगा, तालुका जिल्हा बीड मधील
लीला चिपाडे, जेमतेम पाचवी शिकलेली.
साधारण त्याच वयात पुढे लग्न झाले आणि ती लीला वसंत मिटकरी बनली. लग्न झाले आणि ६०
किलोमीटर बैलगाडीवरून वरात घेऊन वसंतरावांच्या घरी म्हणजे लोणीघाट, ता. जि. बीड येथे आल्या. सुन म्हणून लग्न करून आल्यावर त्या
घरची मोठी सुन. घर हे अगदी छोटे, पण
माणसांनी ते भरगच्च् असे होते. म्हणजे नवरा, चार दीर, दोन नंदा, सासू
सासरे. एकूणच सासरच्या बागेत कळ्या खूप
होत्या. आईला प्रत्येक कळी उमलावयाची होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मायेच्या
पाण्याला कधीच कमी नाही होऊ दिले. मोठी सून म्हणून प्रचंड जवाबदा-या पार पाडाव्या
लागतात. सर्वांचा मान राखावा लागतो, रोज स्वयंपाक घरात काम करावे लागते. सून म्हणून
लग्न करून आले आहे तर सासूला स्वयंपाक घरातून आराम द्यावा लागतो. सासूला यांना काय
आवडते त्यांना काय आवडते, याची विचारणा करून संसार फुलवावा लागतो. हे सगळ आपल्या
अगदी शांत, मनमिळावू स्वभावाने आईंनी अगदी व्यवस्थित करून दाखवले. वडिलांच्या घरी शेती असूनही कधी शेतात काम केले नाही, मात्र लग्नानंतर पती हाच परमेश्वर हे माणून तो जे सांगेल, त्याच्या सुखदुःखात साथ द्यायची म्हणून शेतातली अगदी सर्वच
कामे केली.अडीच वर्षे बीड च्या शेतात काम करून त्यानंतर गाडी पुण्याला थांबली.
वसंतराव पुण्याच्या गणेशपेठेतील मुरलीवाला स्टोअर मध्यें काम करत होते. पगार हा
जेमतेम होता. त्या मुळे पगार येईल आणि घर दिमाखात
चालेल असे आजिबातच काही नव्हते. घर म्हणजे दहा बाय दहा चा महाल होता. तिथेच
गॅस, तिथेचं सिलेंडर, तिथेचं अंथरुण तिथेचं पांगरून. आणि हो तिथेचं त्या दहा बाय
दहा मध्यें राहायला नवरा आणि सोबत दोन दीर देखील. या सर्वांना अगदी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे काम आईंनी अगदी चोखपणे
केले. मात्र हे सर्व करताना पैशाचे सोंग आणता अजिबातच नव्हते येत. त्यामुळे घरी
स्वत:देखील काम केले पाहिजे, या उमेदीने आईने रक्षाबंधन आले की, घरीच राखी तयार
करण्याचे काम सुरु केले. घराला पैसा कसा जोडला जाईल यातून फक्त रक्षाबंधनच नाही तर
दिवाळीच्या वेळी फटाक्यांची विक्री देखील कशी करता येईल हे देखील त्यांनी बघितले. हो अगदी मोठ्या दुकानांमधून खोकी घेऊन त्यांना जळणासाठी
इंधन म्हणून लोकांना विकण्याचे काम देखील काकूंनी केले. पंच्याहत्तर पैश्यामध्ये विकत घेऊन पुढे दीड रुपयांना
विकून अवघ्या पंच्याहत्तर पैशाचा तो एक आधार होता. आपल्याला या दहा बाय दहा च्या घरातून बाहेर पडायचे आहे. यासाठी या नवरा
बायकोंनी मिळून गुलटेकडी येथे अवघ्या चार हजार रुपयांमध्ये घर घेतले. हे चार हजार
रुपये सध्या अवघे वाटतील पण त्यावेळी त्याची किंमत किती होती, आपल्या किती आशा
आकांक्षावर दगडे मारून ते घर झाले होते हे फक्त त्यांनाच माहित.
पुढचा
कालावधी हा आईच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. तिने तिच्यामधील नाविन्यपूर्ण
कलागुणांना जणू वाव दिला होता. आई सुरत ला गेली होती. तेथून भरपूर साड्या विकत
घेतल्या होत्या. सुरतला साड्या खूप छानही भेटतात आणि जरा स्वस्त देखील भेटतात.
म्हणून स्वारी थेट गुजरातमधील सुरत मध्ये होती. भरपूर साड्या खरेदी केल्या. पण
यातली एकही साडी स्वत:साठी नव्हती त्या साड्या होत्या 'लीला साडी सेंटर' मधल्या.
लीला साडी सेंटर हे कोणतेही दुकान नव्हते. आपल्या घरीच पण अगदी लायसन्स काढून
थाटलेले दुकान होते. आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना, ओळखीच्यांना साड्या दाखवायच्या
आणि त्यांना साड्या घेण्यासाठी प्रवृत्त करायचे. येथूनच आमची माउली आईसोबत
मार्केटिंग स्कील शिकली होती. मराठीमध्ये एक म्हण आहे की, बोलणाऱ्याची मातीही विकली जाते –न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही. आमच्या आई छानपणे बोलायला शिकली. मग
अगदी रविवार पेठेत जाऊन सुद्धा ती साड्या आणून दुकानात ती मांडू लागली.
एका बाजूला परिवार वाढत होता. गणेशपेठेतून गुलटेकडी, तिकडून महर्षीनगर, असा
प्रवास सुरु होता. घर मोठ होत होत. म्हणजे घरातील लोकांची संख्या वाढत होती.
भाऊंनी त्याकाळी स्वतःचे काहीतरी करायचे म्हणून औरंगाबादच्या गोपी साबणाचे वितरण
पुण्यात सुरु केले होते. गोपी साबणाची कंपनी औरंगाबाद मधील थोरातांची. पुण्यातल्या
वेगवेगळ्या भागात साबण वितरण करण्यासाठी माणसे नेमायची होती. त्याकाळी कुठे एमबीए
झालेले कामगार भेटायचे. जे त्यांचे मार्केटिंग स्कील दाखवू शकतील आणि बसल्या
बसल्या आपला माल विक्री होऊ शकतो. मात्र जे कामगार भेटतील तेही अगदी महत्वाचे
होते. त्यांच्या जीवावर आपला धंदा मोठा होणार होता. त्यामुळे त्यांना देखील
सांभाळणे फार महत्वाचे होते. त्यात भाऊंचा स्वभाव तापट. त्यांच्या तापलेल्या तापट
स्वभावाच्या तव्यावर वेळोवेळी पाणी टाकून गार करणे हे देखील तितकेच महत्वाचे
असायचे. हे काम केले आमच्या आईसाहेबांनी. कामावरची माणसे कशी जपायची हे आमच्या एच
आर मनेजर म्हणजे आई घरी बसून साध्य करून दाखवायच्या. त्यांच्यासाठी खिचडी, बीडचे
प्रसिद्ध धपाटे करून पाठवायच्या. मग आईच्या हातचे खाऊन बॉस आणि कामगार दोघेही गार.
तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यावर त्याला मांस पाहिजे
असते तसे मला देखील आईने हे धपाटे खाऊ घातले आहे, अतुलच्या डब्यात खास पवार सरांना
हे धपाटे असे वेगळे माझ्यासाठी यायचे. अजूनही येतात. हे माझे नशीब म्हणूयात.
त्याच काळी 'क्योंकी सास भी कभी बहु थी' ही मालिका प्रसिद्ध होती. त्यामधील
तुलसी सर्वांना माहिती असेल. म्हणजे स्मुती इराणी. तिने तिचा पैसा वाढवा यासाठी
एका साबणाची कंपनी टाकली होती. पुण्यामध्ये वितरण चांगले व्हावे यासाठी तिने
भाऊंना हेरलं होत. भाऊसोबत काम करताना भाऊनी होम मिनिस्टर म्हणजे आईंशी देखील ओळख करून
दिली होती. तुम्हाला सर्वांना सांगावयास मला खूप छान वाटते जेंव्हा यांची भेट झाली
तेंव्हा या दोघीजणी यांचा शिक्षणक्षेत्र याच्याशी काहीच संबंध नव्हता. मात्र पुढे
एका बाजूला स्मुती इराणी या भारताच्या भाजपा आघाडी सरकार कडून मानव संसाधन मंत्री
झाल्या, ज्यामध्ये त्यांच्याकडे विद्यापीठ, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अशी
विविध जवाबदारी होती. आणि दुसऱ्या बाजूला आज आमची आई ही देखील श्री स्वराज
एज्युकेशन सोसायटी ची पहिला महिला अध्यक्ष बनली.
तुम्हाला सर्वांना हे सर्वांना सांगणे माझे कर्तव्य आहे की, सध्याच्या राहत्या
घरात जाण्याच्या आधी ही आपल्या महाविद्यालयाची वास्तू आहे ना, ती बांधली गेली
होती, या सर्व भावंडांना एकत्र घेऊन राहण्यासाठी. या ठिकाणी काही मंडळी राहिली पण
मात्र मिटकरी परिवार या वास्तूमध्ये राहण्याचा उपभोग घेण्यासाठी कधी आलाच नाही.
पुढे आपले महाविद्यालय होण्याचा प्रस्ताव येथे आला. फाटक्यातून आपला संसार उभा
करणारी एखादी स्त्री सहज आज आपल्या नवऱ्याला म्हणते की, 'काय करायचे आहे हे सर्व.
भाड्याने द्या पैसा येउद्या". मात्र आईने हे कधीच नाही केले. महाविद्यालयात
थाटण्याच्या निर्णयात त्या अगदीच भाऊनसोबत त्यांच्या सकारात्मक विचारांना माप
देणाऱ्या होत्या. श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी झाली, त्यामध्ये अगदी भाऊ अध्यक्ष
झाले आणि आमची आई सदस्य देखील झाली. या वास्तूमध्ये फक्त शिक्षणाचे दरवाजे नसणार
तर माझ्यासारख्या चार चौघांना आपली ओळख देखील भेटणार. आज मुल मला सर सर करतात. अगदी
मातृदिनाला त्या दिनाच्या शुभेच्छा देखील देतात. हे सगळे याच वास्तूमुळे. आहे कि
नाही मग हि सावित्रीमाई.
फक्त इतकेच नाही तर आळंदीला वसंतराव भक्तनिवास आहे. तुमच्यातल्या काही जणांना
माहिती देखील नसेल. बीडमधील गरीब आणि गरुजू मुलांना शिक्षनासोबतीने अध्यात्मिक
ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी भाऊ आणि आईंनी थाटलेले एक दालन. तीन मजली या
वास्तूमध्ये बरीच मुल शाळा शिकतात, त्याच सोबत ज्ञानोबा - तुकाराम यांचे भजन
गातात. त्याचसोबत तबला पेटी टाळ मृदुंग हे देखील वाजवितात. या सर्व
विद्यार्थ्यांना शाळेत कपडे दरवर्षी द्यायला हि माऊलीच जाते. ज्यावेळी वारी येते
तेंव्हा लेकरांसाठी आणि आलेल्या सर्व भक्तांसाठी सध्याची आपली पद वाढली आहे याचा
कोणताही अहंकार न ठेवता तिला स्वतःला मी मोठ्या कणकेच्या गोळ्याच्या चपात्या
लाटताना मी बघितले आहे. तिला मी घरी जेंव्हा वारी येते तेंव्हा कंबर कसून काम
करताना बघितले आहे. कधीच कोणता अहंकार नाही. काही नाही.
आई थायलंड, मलेशिया, सिंगापूरला जाऊन आली. नवीन शहरात नाही तर नवीन देशात जाऊन
तिथला पोशाख याबद्दल सर्वांनाच आदर असतो. पण आपल्या मातृभूमीचा आदर सोडायचा नाही
म्हणून त्याठिकाणी देखील भारतीय स्त्रियांची शान दाखवावी असे मनाशी ठासून त्यांनी
तेथील पर्यटन स्थळे बघताना फक्त आणि फक्त साडीच परिधान केली.
२०१९ मध्ये
भाऊ आम्हाला सोडून गेले. मिटकरी परिवार आणि आमच्यावर
अगदी आभाळ कोसळावे अशी घटना होती ती. डोळ्यात अश्रू होते सर्वांच्या. आता आमच्या अडचणी कोण
समजावून घेणार. भाऊंनी नेहमीच आमची बाजू उचलून धरली. आता कसे होणार. ऑफिशियल भाऊ गेल्यावर आमच्या
संस्थेला अध्यक्ष पाहिजे होता. भाऊंच्या नंतर ते अध्यक्षपद
त्यांच्या पत्नीचे म्हणजे लीला मिटकरी यांच्याकडे असावे असा आग्रह झाल्यावर लीला
मिटकरी म्हणजेच आमच्या आई श्री स्वराज एज्युकेशन
सोसायटीच्या पहिल्या वाहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. डोळ्यात
अश्रू, शिक्षण देखील अगदीच जेम तेम झालेल्या काकू, हे सर्व पार पाडतील का, असे वाटले. बीडच्या अगदी खेडेगावातून आपला संसार चालवला. नवऱ्याने ज्या ऐटीने
महाविद्यालय सुरु केले, त्या दिमाखाने स्वराज पुढे राहील का, यासाठी काकूंना उभे राहायचे
होते. आपला संसार
चालविण्यासाठी त्यांनी भाऊंना क्षणोक्षणी मदत केली. आता भाऊ
नाहीत. मात्र त्यांनी पुण्यामध्ये सुरु केलेल्या गोपी साबणाच्या वितरणासाठी दिमाखात
उभे राहिलेले नीता एजन्सीज देखील पुढे चालवायचे. बाकी काही नाही मात्र या सर्व ठिकाणी आपल्याला
कर्मचारी वर्ग आहे, त्यांना सांभाळावे लागते, त्यांना व्यवस्थित सांभाळले
तर ते त्यांचे काम चोख पणे करतात. आई त्यांना घरी आले तर चहा
नाश्ता अगदी जेवण करून जा असे हक्काने सांगत. त्यामुळे वाणिज्य क्षेत्र म्हणून आमच्याकडे त्यांचे
जिवंत उदाहरण असते. स्त्री उद्योजिका म्हणून देखील त्यांच्याकडे
बघायला काही हरकत नाही. NAAC चा पहिला दिवस होता. मी दुसऱ्या कॉलेज मध्ये 'माझ्या सादरीकरणात' मी काय टाकू हे विचारले. तेंव्हा
त्यांनी तुमच्या महाविद्यालयाची, महाविद्यालयातील विभागांची
ताकत काय आहे ते ठासून सांगा असे सांगितले. शक्यतो
ताकदीचे अन्य मुद्दे होते. पण म्हणालो काहीतरी हटके असावे म्हणून शोधता शोधता आमच्या
राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्पचे फोटो बघत होतो. मी पहिलाच कॅम्प होता. त्यामध्ये मुलांना त्यांच्या घरापासून दूर नेतोय. त्यांना नीट सांभाळतो आहे
की नाही हे पाहण्यासाठी आई आल्या होत्या. त्याच्यासोबत पटकन एक
फोटो काढला होता. तो फोटो बघितला आणि एकदम
कळल की फक्त आमचे महाविद्यालयच नाही तर महाविद्यालयातील प्रत्येक विभागाची ताकद
म्हणून मी लीला मिटकरी यांचे नाव सांगू शकतो. आमच्या सोबत NAAC च्या दोन
दिवशी त्या अगदी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत होत्या. काही कमी पडते का हे बघायला त्या अगदी कॉमर्स विभागातच बसून
होत्या. दोन दिवस त्या शांत होत्या. मात्र त्यांचे असणे आमच्यासाठी भरपूर काही होत्या. मी माझ्या सादरीकरणामध्ये
त्यांची ओळख करून दिली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या मुलांनी याच NAAC च्या मेम्बर्स साठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले
होते. मी हट्टाने या कार्यक्रमात गणेश पूजन किंवा सरस्वती
पूजन करणे आपल्याला टाळायचे आहे हे सांगितले. आपल्यासाठी आपल्या पुण्यासाठी, आपल्या महाराष्ट्राचे आणि
संपूर्णच भारताचे दैवत म्हणजे शिक्षणाची गंगोत्री उभे करणारे दाम्पत्य महात्मा
फुले आणि सावित्रीबाई फुले. ते दोघेही एका धर्माला एका
जाती पंथाला अनुसरून चालणारे नव्हते. त्यांचे आयुष्य म्हणजेच एक जिवंत देवपण होते. त्यामुळे महाविद्यालयातल्या
तृतीय वर्षातील माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना घेऊन मी त्या दोघांच्या
आयुष्यावरील नाट्यमयी नृत्य सादर केले. स्त्री शिक्षण घेण्यासाठी किती खस्त्या आधी खाल्ल्या आहेत
हे दाखवून दिले. NAAC peer टीम अगदी जिवंत देखावा घडतो आहे असे कार्यक्रम बघत होते. दुसऱ्या
दिवशी NAACची सांगता झाली. त्यामध्ये
त्या टीम मेंबर पैकी एक म्हणजे नाझीर चिराग सरांनी माझ्या कडे आणि आईंकडे बघून "लीला मॅडम, सच बताऊ, आप इस कॉलेज की सावित्रीबाई हो." जम्मू काश्मीर च्या चिराग सरांना आमच्या लीला आई भावल्याच नाही त्यांनी दोन
दिवसात वास्तव ओळ्खल. जी स्त्री शिकली नाही ती गावातून शहरात येऊन मुलांसाठी कॉलेज उभारते. त्या कॉलेज चे NAAC व्हावे म्हणून दोनी दिवस शिक्षक असो, विद्यार्थी असो त्यांना आधारवड म्हणून कॉलेज मध्ये थांबल्या. आई खरेच तू आमची सावित्री आहेस. आई खरच तू आमच्यासाठी मायेचा सागर आहेस, तुझ्याशिवाय
आम्ही घडणे शक्य नव्हतेच.
तू माझी सावित्री मी तुझा यशवंत...