Wednesday, 25 May 2022

त्यांनतरच्या वेदना

 त्यांनतरच्या वेदना

गुगल वरच्या बातम्या वाचताना महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभाग प्रमुख रुपालीताई चाकणकर यांची एक बातमी नजरेस पडली. बातमीचा सारांश असा होता की रुपालीताई यांच्या काकांचे नुकतेच निधन झाले. निधन झाल्यावर काकांना जेंव्हा अग्नी द्यायची वेळ आली, तेंव्हा काकूंचे सौभाग्याचे लेणे म्हणजेच मंगळसूत्र हे तोडण्यासाठी विचारले गेले. काकांच्या मुखामध्ये मंगळसूत्रामधील सोन्याचा मणी ठेवून अंत्यविधी पुढे सरकणार होता. पुढे बांगड्या देखील तोडणे होणार होते. म्हणजे काकूंचे व्हिडीओ सौभाग्य हे काकांशी एकवटलेलं होते आणि काका गेले म्हणजे काकूंच्या असण्या नसण्यानं कोणाला फारसा काही फरक पडणार नव्हता. म्हणजे कोणत्याही भारतीय रितिरिवाजांमध्ये असेच चालत आले आहे. रुपालीताई चाकणकर यांनी यावेळी आवाज उचलला आणि ही संपूर्ण पद्धती मंगळसूत्र न तोडता, बांगड्या न फोडता काकांच्या तोंडात फक्त तुळशीपत्र ठेवून पार पाडायला लावली अंत्य विधी संपन्न झाला देखील.



कळायला लागल्यापासून पहिल्यांदा मी माझ्या मामाच्या मैतीला गेलो होतो. संपूर्ण रडारड. आरडा - ओरडा, काळजाला भेद देणारे वातावरण होते. त्याच ठिकाणी काही वेळात माझी एक मावशी व काही स्त्रिया या अगदी मामीच्या जवळ बसलेल्या मी पाहिल्या. या सर्व आधीच विधवा होत्या. मामीला धीर देण्याचे काम जणू यांच्यावर सोपावले गेले होते. बर या धीर देण्याचा शेवटचा भाग म्हणजे मामीचे मंगळसूत्र तोडणे, तिच्या बांगड्या फोडून या सर्व सौभाग्याच्या गोष्टी मामाच्या चितेवर सोपावणे. 

गावाकडे शक्यतो बायका स्मशानात जात नाहीत म्हणून या सर्व गोष्टी घरीच केल्या जातात जिथे ती स्त्री लग्न करून आली. जिथे तीने लग्न करून माप ओलांडले. जिथे स्त्रीने तिचा नवीन संसार थाटला जिथे तीने सासूबरोबर स्वयंपाकघरात बऱ्याच नवीन पदार्थांना आकार दिला. जी सासूसोबत अगदी चार घरी दाग-दागिने घालून मिरवायची, जिने स्वतःला मूल झाल्यावर त्यांचे बारसे, वाढदिवस यात अगदी दागिने घालून मिरवलं या सगळ्या गोष्टी काय तिला तर अगदी कुठे बाहेर जायचे असेल तर ती तासन तास आरश्यासमोर बसायची, अगदी ब्युटी पार्लर मध्ये पण जायची. या सगळ्या गोष्टी जरी एकीकडे सौभाग्याचे लेण असल तरीही दुसरीकडे त्या स्त्रीच्या वैयक्तिक तिच्यासाठीच्या पण असायच्याच ना. मग तिचा नवरा गेला की तिचे सौंदर्य संपते का? हा प्रश्न समोर थांबतो.

विधवांना नवऱ्याच्या चितेत ढकलून देणे थांबले, विधवा केशवपन थांबले. मात्र विधवांची ही त्यांच्या सौंदर्यापासूनची अडवणूक ही त्यांना खरंच मनापासून वेदना देणारी आहे.

त्यातूनही आजकालच्या जगामध्ये एखादी विधवा स्त्री नटली तर तिला जग बोलते, तिचा शृंगार नक्की कोणासाठी आहे यावर प्रश्न काढले जाऊ शकतात. पण तो तिच्यासाठीच असू शकतो हा नवीन विचार रुपालीताई चाकणकर यांनी बांधून दिला आहे. प्रथा बदलू शकते त्यात नवीन विचारांची गरज आहे हे तितकेच खरे आहे. निदान व्यक्ती म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, व त्याचे एक वेगळे आयुष्यं आहे त्या वेगळ्या आयुष्यात साथीदार कालविवश झाला तर पुढे जाण्यासाठी एक वेगळा लढा द्यावा लागतो. त्यातले जगणे पैलवावे लागते, त्यामुळे निदान या ज्या जुन्या चालिरिती आहेत, त्यांना थोड बदलूयात.

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...